भारतीय शिष्टमंडळात शशी थरुर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे   

नवी दिल्ली : जागतिक मंचावर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी पाठविण्यात येणार्‍या शिष्टमंडळात काँग्रेसचे खासदार शशी थरुर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि द्रमुकच्या खासदार कनीमोळी यांच्यासह विविध पक्षांचे खासदार सहभागी होणार आहेत. त्याशिवाय रवी शंकर प्रसाद आणि संजय झा यांच्यासह अन्य सात पक्षांच्या खासदारांचा शिष्टमंडळात समावेश केला आहे.
 
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर केंद्र सरकारने जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया उघड करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्या अंतर्गत सात पक्षांचे खासदारांचे शिष्टमंडळ दहा देशांत  पाठवले जात आहे. त्या अंतर्गत दहशतवाद मुक्त जगाचा नारा दिला जात आहे. 
 
खासदारांचा शिष्टमंडळात समावेश करुन सरकार राष्ट्रीय मतैक्य तयार करत आहेत. त्यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील सदस्यांचा समावेश असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे बिजयंत जय पांडा आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा देखील समावेश आहे. या संदर्भातील माहिती संसदीय व्यवहार मंत्रालयाने शनिवारी दिली. सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ हे भारताच्या राष्ट्रीय मतैक्याचे दर्शन घडविणार आहे. त्या माध्यमातून सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात लढा आणि त्याविरोधातील प्रखर प्रकटीकरण करणार आहे. देेशाने दहशतवाद मुक्त जगाचे स्वप्न पाहिले आहे. 
 
काँग्रेसची नाराजी

 

केंद्र सरकारच्या शिष्टमंडळासाठी काँँग्रेसने चार खासदारांची नावे सुचविली होती. मात्र, त्यापैकी एकाचेही नाव सरकारने स्वीकारले नाही. या उलट शशी थरुर यांचे नाव यादीत नसताना त्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने आनंद शर्मा, गौरव गोगोई, सयद नसीर हुसेन आणि अमरिंदर सिंग यांची नावे सुचविली होती. सरकारने पक्षाशी चर्चा केली नाही  परस्पर नावे यादीत टाकली असा आरोप त्यांनी केला. 

Related Articles